विदर्भ ही संतांची,महंतांची भूमी. या भूमीत जन्मलेले संत गाडगेबाबा हे फक्त कर्मयोगीच नाही तर धर्मयोगी व विज्ञान योगी असे संत होते.गाडगेबाबांचे मूळ नाव डेबुजी झिंगराजी जानोरकर. त्यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 रोजी अमरावती जिल्ह्यातील शेंडगाव या ठिकाणी झाला गाडगेबाबांनी विदर्भाच्या भूमीला नावलौकिक मिळवून देण्यासाठी आपले आयुष्य अर्पण केले . पण त्यांचे स्वतःचा आयुष्य अतिशय खडतर होतं. तो काळ होता अज्ञानाचा, अंध:काराचा आणि महत्त्वाचं म्हणजे विज्ञानवादी दृष्टिकोन नसलेला. कर्मकांड व अंधश्रद्धेच्या नावाखाली समाज भरडून निघाला जायचा. ज्या काळामध्ये मुक्या जनावरांचा बळी दिला जायचा कारण देव पावला पाहिजे म्हणून. अशा काळात एक आशेचा किरण जन्माला आला तो म्हणजे डेबुजी. बालपण फार आनंदात गेले नाही परिस्थिती जेमतेम आणि वडील व्यसनाधीन. आजही शेंडगाव मध्ये बाबांचे एकशे आठ वर्ष जुने घर असून चौथी पिढी सध्या राहत आहे.
वयाच्या आठव्या वर्षी डेबुजींचे वडील निधन पावले, पितृछत्र हरवले. आईचे नाव सखुबाई. आई सोबत डेबूने आपल्या मामाचं गाव गाठलं, गावाचे नाव दापुरा. मामाचे कुटुंब गरीब व कष्टकरी होते. गुरे राखणे,शेती काम ते करत.प्राण्यांविषयी दया भाव त्यांच्या मनात तेव्हापासूनच होता. गुरे चरायला घेऊन गेल्यानंतर डेबू भजन गात बसायचा, मित्र मंडळी गोळा करायचा. शिक्षणासाठी त्यांचा फारसा प्रवास झाला नाही. परंतु त्यांना धार्मिक कथा ऐकण्याची व समाजातील अन्याय विरुद्ध विचार करण्याची आवड होती. डेबूजींना लहानपणापासून समाजातील अंधश्रद्धा जातीभेद रुढीपरंपरा यांचा तिरस्कार होता. वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांचे लग्न खंडाळकर घराण्याची रूपवान मुलगी कुंताबाई हिच्याशी झाला. त्यांना चार मुली व एक मुलगा ही झाला. एकुण वीस वर्षे त्याने मामाच्या घरी चाकरी केली.त्यांनतर 29 व्या वर्षी घर सोडून सामाजिक कार्याला वाहून घेतले.
एका हातात गाडगे व दुसऱ्या हातात झाडू घेतला गाव झाडत झाडत ते दापूऱ्यातून बाहेर पडले , ते पुन्हा गावात आले नाही.पुढे डेबूजी चे नाव गाडगेबाबा असे पडले. ज्या ज्या गावात ते जात त्या ठिकाणी सार्वजनिक स्वच्छता करा असा त्यांचा मुख्य संदेश असे. कीर्तनाच्या माध्यमातून लोकांना अंधश्रद्धा, जातीयता आणि व्यसनांपासून दूर राहण्याचा ते सल्ला देत. व्यसनामुळे दारिद्र्य येते असे ते सर्वांना सांगत. साफसफाई, अंधश्रद्धा निर्मूलन,आणि गाडगेबाबा हे त्याकाळचे समीकरणच होते. त्यांनी सुरू केलेल्या सामाजिक कार्यामुळेच गाडगेबाबांना “संत गाडगेबाबा” असे म्हणून संबोधले जाऊ लागले. आपल्या कीर्तनातून ते लोकांना आपल्या मुलांना शिकवा, त्यांना शिक्षण नाही तो केवळ खटार्याचा बैल, असे सांगतं
संत गाडगेबाबांनी प्राणी हत्या व बळी प्रथेला कठोर विरोध केला. त्यांच्या कीर्तनातून ते नेहमीच लोकांना प्राणी हत्येचे पाप व याचा समाजावर होणारे नकारात्मक परिणाम ची जाणीव करून देत असे. जिवंत प्राण्याचा बळी देऊन देव प्रसन्न होत नाही असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला, आणि त्या ऐवजी मानवता सेवाभाव व प्राणीमात्रावर करूणा दाखवण्याचा उपदेश केला. संत गाडगेबाबांच्या मते प्रत्येक प्राण्याला जगण्याचा अधिकार आहे. त्यांनी शिकवले की दया व करूणा हाच खरा धर्म आहे. प्राण्यांची हत्या ही मानवी अहंकार व अंधश्रद्धा तसेच अज्ञानाचे लक्षण आहे असे ते सांगत.
त्यांची भारुडे लोकांच्या मनाला भिडत असे आणि प्राणी हत्या थांबून प्राणी दया हा संदेश लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचला जात असे. बैलांवर अत्याचार होतात म्हणून शंकरपाट बंद करावे असे सांगितले. हुंडा प्रथेला विरोध केला, स्त्रियांच्या सन्मानासाठी झटले.देवाला खुश करण्यासाठी प्राण्यांचा बळी देण्याची परंपरा चुकीची असल्याचे ते ठामपणे सांगत. अंधश्रद्धेपोटी हे पाप करू नका असेही ते सांगत. देवाला प्रसन्न करायचे असल्यास प्राण्यांच्या रक्ताऐवजी गरीब गरजू लोकांची सेवा करा हीच खरी पूजा आहे. या भावनेतूनच त्यांनी शाळा,आश्रम शाळा,धर्मशाळा, पाणपोई व पशुवैद्यकीय दवाखाने स्थापन केले. नाशिक देहू आळंदी पंढरपूर या ठिकाणी त्यांनी धर्मशाळा बांधल्या.
गरजू मुलांना शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी अनेक शिक्षण संस्था काढल्या, सन एकोणीसशे त्रेसेष्ट साली वलगावात पेढी नदीच्या काठाशी त्यांनी एक वृद्धाश्रम काढला.भुकेल्यांना अन्न, पाणी,उघड्या बाघड्यांना वस्त्र,गरीब मुला मुलांना शिक्षण, बेघरांना आसरा, अंध पंगू रोगी यांना औषधोपचार, बेकारांना रोजगार, गरीब तरुण तरुणींचे लग्न, दुखी व निराशांना हिम्मत , व मुक्या प्राण्यांना अभय हे दशसूत्रीचे पालन करून आजही हा वृद्धाश्रम चालवला जातो.
गाडगेबाबांनी कुठल्याही विद्यापीठात शिक्षण घेतले नाही किंवा कुठल्याही ग्रंथ लिहिला नाही, परंतु त्यांचे कीर्तनातील विचार हे ग्रंथांचे सार असायचे. संत तुकारामांना ते आपले गुरु मानायचे.आपल्या शेवटच्या कीर्तनात त्यांनी म्हटले, देव कसा असेल,देव कोणी पाहिला नाही, ज्यानं हे ब्रम्हांड चालवले तो कोणाला दिसणार नाही. प्राण्यात, माणसातच देव पहा, वारा कोणी पाहिले का? संपूर्ण सृष्टीत देवाचं अस्तित्व आहे. असे ते सांगत.
नवस व अंधश्रद्धे विरुद्ध प्रचंड जनजागृती करून महाराष्ट्रातील 67 खेड्यात बळीची प्रथा बंद केली. अरे शेळीच्या लेकराचा जीव घेऊन तुम्हाला लेकरू होईल का? असा प्रश्न आपल्या कीर्तनातुन ते लोकांना विचारत.प्राणीमात्राचे रक्षणाची मोहीम त्यांनी राबवली. यात्रेतील हिंसा बंद करण्यासाठी प्राण पणाला लावले.
संत गाडगेबाबांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांच्या विचारांचे स्मरण करून त्यांचा वैचारिक आदर्श स्वीकारण्याचाहा दिवस. या दिवशी ठिकठिकाणी विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते तसेच स्वच्छते विषयक विविध उपक्रम घेतले जातात. शासनाने संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबवले. तसेच अनेक सामाजिक संस्था त्यांच्या कार्याचा गौरव करून विविध कार्यक्रम राबवतात. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ हे त्यांचे नाव असलेली प्रमुख संस्था आहे. संत गाडगेबाबांचा आदर्श घेऊन या ठिकाणी विविध उपक्रम राबविले जातात. स्वच्छता ही सेवा,व बाबांनी दिलेली दशसूत्री या तत्त्वावर या संस्थेचा प्रवास आजपर्यंत सुरू आहे व प्रेरणादायी आहे. त्या काळी कीर्तनाच्या माध्यमातून बाबांनी लोकांच्या डोक्यातील जळमटे झटकली.
अरे देवाला ना लागते मांस, सोडूया मिळून हा अंधश्रद्धेचा फास
आपल्या शेवटच्या काळात नागरवाडी येथील झोपडीत राहायचे. नागरवाडी ही त्यांची कर्मभूमी होती. आजारी असल्यामुळे आपल्या गाडीतून अमरावती या ठिकाणी उपचारासाठी जात असताना, वलगाव येथील पेढी नदीच्या पुलावर त्यांनी वयाच्या 80 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ती रात्र होती 20 डिसेंबर 1956 ची.. त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यभर समाजातील अज्ञान,अंधश्रद्धा, स्वच्छता,अस्पृश्यता,जातीभेद, समाजातील व्यसने व गरीबी दूर करण्यासाठी प्रयत्न केले तसेच प्राणीहत्या,बळी प्रथा याविरोधात कठोरपणे आवाज उठवला.देवळातील कर्मकांडापेक्षा स्वच्छता व सेवा ही महत्त्वाची असल्याचा संदेश त्यांनी लोकांना दिला. गाडगेबाबा त्यांच्या थोर उच्च विचारसरणीच्या रूपाने आजही आपल्यात जिवंत आहेत.
संत गाडगेबाबांना माझा शतशः प्रणाम.धन्यवाद.
लेखिका सौ. पल्लवी संजय आल्हाट.
श्रीरामपूर

