प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज– चंद्रपूर – ‘कविता ह्या नुसत्या कविता न राहून त्यातून समाजप्रबोधनाचे कार्य व्हायला हवे, मन आणि मेंदूने त्यावर उत्स्फूर्त प्रतिक्रिया द्यायला हवी आणि त्यातून माणसाचा विवेक जागृत व्हायला हवा…’बोलत राहिले पाहिजे…’ या कविता संग्रहातून याच जाणीवा पेरण्याची छोटासा प्रयत्न करते आहे…’बोलत राहिले पाहिजे…’ ही या कवितासंग्रहाची प्रतिनिधीक कविता असून ती कुटुंबापासून देशपातळीपर्यंत अशा व्यापक अर्थाने अर्थबोध देते. आपल्या माणसांच्या हक्कासाठी, त्यांची सद्सद विवेकबुद्धी जागृत ठेवण्यासाठी आणि अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्यासाठी ही कविता नेतृत्व स्वीकारायला आवाहन करते.’ असे मनोगत कवियत्रिने आपल्या मनोगतात व्यक्त केले.
चंद्रपुरातील नवकवियत्री वैशाली धनविजय रामटेके यांच्या कवितासंग्रहाचे आणि लघुचित्रपटाचे स्क्रिनिंग प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला एन डी. हॉटेलच्या प्रशस्त सभागृहात आयोजित केल्या गेले होते.

प्रख्यात व्याख्याते, समीक्षक, मराठी विभागप्रमुख रा.तू.म. विद्यापीठ नागपूर डॉ. शैलेंद्र लेंडे या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. ‘सत्याच्या कणाकणांना स्पर्श करत’ कवयित्रीची कविता पुढे आली आहे. ‘व्यक्त होण्याला स्वतंत्र महत्त्व आहे, तिच संवेदना कवितासंग्रहातील या ७५ कवितामधून कवयित्रिने व्यक्त केली आहे. ‘बोलत राहिले पाहिजे…’ ही निर्मिती संवेदनशील, भावनाशील आणि खंबीर मनाची अभिव्यक्ती आहे. यावेळी अध्यक्षीय स्थानावरून त्यांनी या भावना व्यक्त केल्या आणि कवयित्रीच्या उज्वल भविष्याला शुभेच्छा दिल्या.

यावेळी मा. नरेंद्र जरोंडे, विधिसल्लागर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, प्रख्यात लेखक इसादास भडके, संध्याताई विरमलवार, अध्यक्षा संस्कार भारती चंद्रपूर, प्रसिद्ध चित्रकार सुदर्शन बारापात्रे यांनी पुस्तकावर भाष्य केले. कवयित्रीच्या कवितांची निर्मिती ही तिच्या भावनाशील आणि संवेदनशील मनाचा प्रतीक आहे हे तेवढ्याच आत्मीयतेने त्यांनी मंचावरून सांगितलं. खचाखच भरून असलेल्या या सभागृहात तेवढ्याच तोडीचा प्रेक्षक वर्ग अनुभवास मिळाला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेत्री सुमेधा श्रीरामे, चंद्रपूर यांनी आणि आभार मानसोपचारतज्ञ स्नेहा कोळगे, मुंबई यांनी केले. सभागृहातील व्यवस्थापन, कार्यक्रमाची उत्कृष्ट बांधणी,साहित्य समाज आणि चित्रपट या क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती, प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यातून पुस्तकाची आणि कवयित्रीची यशस्वीतेकडे वाटचाल सुरू राहील हे निदर्शनास आलं आणि कार्यक्रमाची सांगता झाली.

