परिस्थिती, दुःख,शोषण, अगतिकता,स्वैराचार व अत्याचाराचे : एकता रंगभूमीचे ‘भयान’ नाटक

0
208

लेखक प्रा. राजकुमार मुसणे

एकता नाट्य रंगभूमी वडसा प्रस्तुत ताजुलभाऊ उके निर्मित, मुन्नाभाई बिके दिग्दर्शित, प्रा.धनंजय ढवळे लिखित ‘भयान ‘नाटकाचा प्रयोग अभिनव नाट्य कला मंडळच्या सौजन्याने एक फेब्रुवारी २०२५ ला बाबूपेठ, चंद्रपूर येथे रसिक प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादात संपन्न झाला.गुराढोरांची कत्तल व तस्करी करणाऱ्या खडकसिंग यादव या दुष्ट प्रवृत्तीच्या गुंडाच्या कारनाम्यावरील हे नाटक आहे. खडकसिंग हा मूळचा बिहारचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करणारा, तिथेही क्रूर कारनामे करून दोनशे करोड चा अपहार करुन तडीपार झालेला.जनावरांची कत्तल व तस्करीच्या व्यवसायात सक्रिय असल्याने खालपासून ते वरपर्यंत ५० करोड चंदा देणारा कुख्यात गुंड आहे. त्याने यापूर्वी अनेकांवर अत्याचार व अन्याय करणाऱ्या सराईत गुन्हेगाराने शंभर मुलींच्या दफनाचे क्रूरकर्मही केले आहे. गोरख धंदे करणाऱ्या खडकसिंग यादव यांच्या मार्गात आडकाठी ठरणाऱ्यांना दडपशाहीने संपवितो. महिलावर अत्याचार, कुटुंब उदध्वस्त करणे, खून, हाणामारी , दहशत निर्माण करणे. त्याच्या विरोधात जो कोणी आवाज उठवितो, त्याला नेस्तनाभूत करतो. गाई, बैल, वासरे गुराढोरानी भरलेला ट्रक ड्रायव्हर आनंद पोलीस स्टेशनमध्ये नेतो. ट्रक ड्रायव्हर आनंद च्या गळ्यावर खडकसिंग तलवारीने वार करून संपवितो., आनंदच्या आई-वडिलांना छळतो, त्याच्या त्रासामुळे माधव परदेशी अपंग होतात, पत्नी आंधळी होते. ड्रायव्हर आनंदच्या सांगण्यावरून खडकसिंगला अटक करायला गेलेली महिला पोलिस अधिकारी सानिया सुभेदार तिचीही मुंडी छाटतो. खडकसिंग यादव यांचे काळे धंदे उघडकीस आणणारा कर्तव्यदक्ष पत्रकार धीरज देसाईचा उजवा हातच कापून टाकतो, त्याच्या काजल पत्नीवर बलात्कार करतो, छोट्या बाळाला फेकत आपटून मारतो. मायासोबत खोट्या प्रेमाचे नाटक करीत जाळ्यात अडकवतो. गर्भधारणा झाल्यावर ती पोलीस स्टेशनमध्ये गेली हे कळताच लग्नाचे नाटक करून तिची हत्या करतो. राज व चंदाला बेदम मारहाण करतो. धमकावणे, मारणे अत्याचार करणे, छळ करणे, दडपशाही करणे आणि जीवानिशी संपविणेअसा दुष्ट अत्याचारी म्हणजेच खडकसिंग होय. त्याला अभय देणारा भ्रष्ट पोलीस अधिकारी गणपत गायतोंडे हाही राजला खोट्या गुन्ह्याखाली अटक करतो. त्याच्यावर अत्याचार करतो ,मारहाण करतो. गायतोंडेची वाईट नजर चंदावर असते. राज्य आई-वडिलांवर पेट्रोल टाकून पेटवण्याचा प्रयत्न करतो.स्त्रियांवर अत्याचार, सर्वसामान्य नागरिकांना कायद्याच्या नावाखाली त्रास देणे व गुंडांना मात्र अभय देणारा पोलीस अधिकारी गणपत गायतोंडे भ्रष्ट व दुष्ट प्रवृत्तीचा भयान आहे.

माधव परदेशी यांच्या कुटुंबातील समस्या भयानकता गडदपणे दर्शविणारीच आहे. पोठचा गोळा ड्रायव्हर अरविंदची हत्या झाल्यानंतर कुटुंबाची शोककळा, भ्रष्ट पोलीस अधिकारी गायतोंडेच्या मारहाणीमुळे माधव परदेशीचा पाय जात येणारे अपंगत्व, आईच्या मनावरील आघात, परिस्थितीने खंगल्यामुळे गायक राजची फरफट, मायाचे थांबलेले शिक्षण , आईचा ब्रेन ट्युमरचां गंभीर आजार या समस्येच्या भयानतेमुळे हवालदिल झालेले कुटुंब आहे.

अत्याचारी, अन्यायी, क्रूर खडकसिंग यादव (मुन्नाभाई बिके), अन्यायाच्या रक्षणासाठी नव्हे तर भक्षणासाठी असलेला भ्रष्ट पोलीस अधिकारी गणपत गायतोंडे+सोमनाथ नागवंशी), सर्वसामान्य कुटुंबाची गुजरात करण्यासाठी धडपडणारा प्रेमळ पिता माधव परदेशी (प्रा.अविनाश सहारे), सहनशील अगतिक ब्रीन ब्रेन ट्यूमरच्या आजाराने ग्रस्त गंगा (करिष्मा भाग्यवंत), कुटुंबाच्या उपजीविकेसाठी प्रयत्नरत प्रामाणिक ड्रायव्हर अरविंद (प्रदीप उके), गीतकार कलावंत कुटुंबाची जबाबदारी लक्षात घेणारा काळजी वाहू ,विचारी,विवेकी, रंभावर प्रेम असूनही प्रचंड संयमी (स्वर. निकेश खोबरे), उच्च शिक्षणासाठी धडपडणारी परंतु परिस्थितीने हतबल झालेली आणि बादलच्या प्रेम जाळ्यात अडकलेली माया (ज्योती राऊत), अन्यायाविरुद्ध बिनधास्तपणे वाचा फोडणारा, अवैध मार्गासआळा घालण्यासाठी लेखणी झिजवणारा, न्याय मिळण्यासाठी धडपडणारा, कर्तव्यदक्ष पत्रकार धीरज देसाई (लेखाराम हुलके), पतीच्या कार्यात निष्ठेने सहकार्य करणारी काजल (सोनल गोरखे), आपल्यातील नृत्यकलेचा आविष्कार बिनधास्त करणारी , राजाच्या गायनाचे चीज होण्याकरिता योग्य सल्ला देणारी मैत्रीण,ताईच्या खुनाचा बदला घेण्यासाठी धडपडणारी चंदा (स्नेहल गेडाम), विनोदवीर बटुक (अरविंद वाघधरे), भोला (हास्यजत्रा फेम कुणाल मेश्राम) या पात्रातील संवादातून भयान नाट्य उलगडते. सकस खासदार अभिनय करणाऱ्या कलावंतांच्या बळावर नाटक यशस्वीरित्या साकार झाले. बिहारी भाषेचा लहेजा, आगळी स्टाईलचे मुन्नाभाई बीके व सोमनाथ नागवंशी यांच्या जबरदस्त संवादफेक व अंगिक, वाचिक अभिनयाने पात्र जिवंत साकारले.
भयान नाटकातील विनोदही वैशिष्ट्यपूर्ण आहे. चमत्कार -बलात्कार, पोकली , बंबूऱ्या, पुगडी,सामान ,जेथे बुवा तेथे धुव्वा ,जांगडगुत्ता, किटकुर, मोठ्याने धुतलं,पूटपुट कुट कुट, सुजवलंन,’का गा नाही का’, हनिमून, भैताडबेलणी, सकणाऱ्या, मटन- बटन, इंगाडपुतण्या, लुपलुप ,ठस ठस, दोधडी मालीश, रमदाडू अशा हास्योत्पादक शब्दोच्चाराने व ‘असा मी नाही म्हणत, तो म्हणते, पण मनानं चांगलं हाय’, विलक्षण संवादाने हास्याचे फवारे उडत प्रेक्षक खुर्चीला खिळून राहतो.

नाटकातील संवादही भारदस्त आहेत.
‘गेला रे गेला आईच्या गावात बाराच्या भावात”जेव्हा शंभर हरामजादे मरतात तेव्हा एक हरामखोर खडकसिंग पैदा होतो.’अशा समाधानी खलप्रवृत्तीची भयानता प्रकर्षाने जाणवते. किंबहुना राजुला मुंबईला संगीत क्षेत्रात करिअरची उत्तम संधी उपलब्ध होते परंतु आई-वडिलांची जबाबदारी लक्षात घेता संधी नाकारतो. त्यावेळेस झाडाच्या पिकलेल्या पानाचा संदर्भ देत संधीचं सोनं करण्याविषयी केलेला उपदेश नाटककार धनंजय ढवळे यांच्या लेखनाचे विशेष दर्शविणारा आहे.
नाटकातील संगीतही वैशिष्ट्यपूर्ण आहे.
‘या यवनाला जपले मी आजवर ‘रात अशी प्रित नशिली, ही रात भिजलेली सजलेली’, या ठसकेबाज लावण्या स्वरबहार निकेश खोबरे यांच्या सुमधुर गायनाने”सुटला भयान वारा, माझे स्वप्न गेले वाहून, शोधू कुठे किनारा , या अंधार जीवनी ,सांग लिहू कसा हृदयाच्या पानावरील प्रेम कहाणी ‘ ‘ही प्रीत सजवून झालो तुझा दिवाना’ या प्रेमगीताने व ‘तुझ्या रूपाचं पडलंय चांदणं मला भिजू द्या गाणं वाजू द्या ‘या कुणाल मिशन यांनी गायलेल्या विनोदी गीताने नाट्यप्रयोगात चांगलीच रंगत आली. भयान नाटकाचे शीर्षक गीत अप्रतिम.नाटयशय प्रभावीपणे अभिव्यक्त करणारे गीतकार आदेश राऊत यांचे शब्द व पार्श्वगायन नाटकाचे नेमके मर्म प्रतिपादन करीत प्रेक्षकांना अंतर्मुख करणारे होते.
“शोधू कुठे किनारा आला भयान वारा ,दुःख सागराच्या काठी मांडू कसा निवारा,जखमा उरात माझ्या किती सावरून घेऊ, अबोल वेदनांचा किती काल अंत साहू, कसा हा सावरावा मनातला पसारा हरवून गेली वाट अंधार जीवनी आला ,अन्याय रोखणाऱ्या शब्दांचा अंत झाला ,केला क्षणात सारा उध्वस्त हा पहारा,संसार मोडलेला जोडू कसा किती मी,हा खेळ सावल्यांचा खेळू कुठे कुठे मी,किती सोसलेत घाव घायाळ जीव झाला ,हा मांडला कसा रे नियतीने डाव सारा ,अतृप्त भावनांचा केलास कोंडमारा, सुख दुःख जीवनाचे सारे गहाण आहे.जगणे इथे जीवांचे झाले भयाण आहे ,मारेकऱ्यांनी केला पुन्हा नवीन मारा, वाट पाहू मी कुणाची आता त्या वाटेवरती ,वाटे कुणास मी हो जळता जरी निखारा,गीत हरवून गेली वाट. अंधार. गेला क्षणात..
शोधू कुठे किनारा…”अप्रतिम रचनेने चांगलीच रंगत आली.

पोलीस अधिकारी असलेल्या सानिया सुभेदार या बहिणीच्या खुनाचा बदला घेण्यासाठी सरसावलेली नर्तकी चंदा ,खडकसिंगच्या विरोधातील सर्व पुरावे जमा करण्याकरिता ती बटूक व भोला यांना आपल्या कटात सामील करून खडक तुमच्या घरात नोकरी करण्याकरिता पाठविते. वरच्या मजल्यावरील खोलीची चावी मागून त्यातील महत्त्वाचे कागदपत्राची फाईल, पेन ड्राईव्ह जमा करते.खडकसिंग तिला छमिया म्हणतो .पेन ड्राईव्ह व फाईल मागतो.पत्रकार धीरजचा गळा आवळून खून करतो. शेवटी मात्र अगतिक झालेले पण सुडाच्या भावनेने पेटून उठलेले राज व चंदा तलवार व हातोडीने खडकसिंगवर वार करून महाभयंकर प्रलयकारी क्रूरकर्म्याचा अंत करतात.

एकंदरीत हे भयान आहे परिस्थितीचे, गरिबीचे, अगतिकतेचे,अत्याचाराचे, स्वैराचाराचे, दुःखाचे, आक्रोशाचे, आक्रंदनाचे, धडपडण्याचे, जगण्यासाठी आटापिटा करणाऱ्यांचे.समाजातील विदारकतेची भयानता प्रकर्षाने नाटकातून दर्शविली आहे. दुष्ट माणसांचे वाढते प्राबल्य व समाजविघातकता चिंतनीय असल्याचे नाटकातून प्रत्ययास येते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here