आपल्या मराठीत म्हण आहे “हात धुवून पाहिले पण नशीब धुवून नाही पाहता येत.”
थोडक्यात कुणाच्या नशिबात काय आहे? हे सांगता येणे कठीण! नशीब म्हणजे आयुष्यातील कार्यांचा अनुभव. तो चांगला किंवा वाईट, योग्य व अयोग्य असा असू शकतो. ‘भाग्यवान’, ‘कमनशिबी’ अशा संकल्पना यातूनच उदयास येतात. परिणामी व्यक्तिपरत्वे नशिबाच्या व्याख्या अनेक प्रकारे मांडता येतील.
सामान्यता नशीब म्हणजे परिणाम किंवा साध्य. एखादी गोष्ट साधण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात , या प्रयत्नांना कष्ट वा कर्म म्हणता येईल. आपण केलेल्या कार्यांनाच कर्मे संबोधतात. तेही दोन प्रकारचे असू शकतात ‘सकर्म’ व ‘अकर्म’ फळाची अपेक्षा करणे वा न करणे.
प्रयत्न करीत राहणे आपल्या हातात आहे परंतु, त्याचा परिणाम म्हणजे कर्माचे फळ हे आपल्या हातात नाही. म्हणजेच मिळाले तर ‘भाग्यवान ‘ आणि जर प्रयत्न करूनही नाही मिळाले तर नशीब आपले…. असे आपण म्हणतो.
एक प्रकारे ‘दैव’च म्हणाना ! योग्यतेच्या कसोटीने दैवाचीही दोन रुपे होतात ‘सुदैव’आणि ‘दुर्दैव’.
बऱ्याच प्रकरणांमध्ये जीवतोड मेहनत व भरपूर प्रयत्नही निष्फळ ठरताना दिसतात. अशा वेळी हार न मानता , खचून न जाता, पुन्हा जोमाने कामास लागले पाहिजे. एका अर्थी नशिबाला देखील मात देणे, मनुष्याच्या हाती आहे, हे विसरता कामा नये. नाहीतर निराशेच्या गर्तेत जाण्याची वेळ येते किंवा निष्काम कर्मात केव्हाही विश्वास ठेवणे चांगलेच कारण तेथे निराशेस अजिबात ठाव नाही.
उर्मिला सयाजीराव दूरगुडे अकोले
अहिल्यानगर

