आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विकसित भारतावर मांडले विचार
ब्रह्मपुरी येथील ‘विकसित भारत @ २०४७’ प्रोफेशनल मीट कार्यक्रमात साधला संवाद
ब्रम्हपुरी – राष्ट्र सर्वोपरी हा विचार घेऊन देशगौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली जबाबदारी सांभाळली आणि गेल्या अनेक वर्षांमध्ये जे होऊ शकले नाही ते फक्त अकरा वर्षांमध्ये करून दाखवले. त्यांनी पुढच्या अनेक दशकांचा विचार केला. देशाला स्वातंत्र्य मिळून शंभर वर्षे पूर्ण होतील त्यावेळी माझा भारत कसा असेल याची तयारी आज सुरू केली. २०४७ पर्यंत विषमतामुक्त, भयमुक्त, नक्षलमुक्त आणि त्याचवेळी रोजगारयुक्त, समतायुक्त, समरसतायुक्त गौरवशाली भारताच्या निर्माणाचा संकल्प केला, असे प्रतिपादन राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
ब्रम्हपुरी येथे आयोजित ‘विकसित भारत @ २०४७’ प्रोफेशनल मीट या कार्यक्रमाला आ. मुनगंटीवार यांची उपस्थिती होती. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला माजी खासदार अशोक नेते, माजी आमदार अतुल देशकर, भाजपा जिल्हाध्यक्ष हरीष शर्मा, महिला जिल्हाध्यक्ष वंदना शेंडे, रामजी लाखिया, प्रज्वलंत कडू, प्रा. शेख, अरुण शेंडे,अरविंद नंदूरकर, प्रकाश बगमारे, श्रीराम पाटील डोंगरवार, तनय देशकर,मनोज भूपाल, साकेत भानारकर, रामलाल दोनाडकर, मनोज वाठे, सुयोग बालबुधे, ज्ञानेश्वर दिवटे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार मुनगंटीवार म्हणाले, ‘२६ मे २०१४ रोजी जनतेच्या आशीर्वादाने स्वतःला प्रधानसेवक ही उपाधी लावणारे देशगौरव नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले. ९ जून २०२४ ला तिसऱ्यांदा लोकांनी आशीर्वाद दिला. जनतेसाठी आम्ही काय करतोय आणि आमचा संकल्प काय आहे, हे विविध उपक्रमांच्या माध्यमातून मा. मोदीजींनी देशाला सांगितले. त्यांनी हजारो कामे केलीत. पण संपूर्ण देशात देशभक्तीचा विचार जागृत केला, हे मला सर्वाधिक वैशिष्ट्यपूर्ण काम वाटते. देश एक आहे, राष्ट्र सर्वोपरी आहे, अशी भावना प्रत्येकात निर्माण केली. माझ्यादृष्टीने त्यांच्या प्रत्येक कामाचा केंद्रबिंदू राष्ट्रभक्ती आहे. ‘मै देश नहीं झुकने नहीं दुंगा’ हा त्यांचा भाव विकासाचा केंद्रबिंदू आहे.’
‘आपल्या देशाचा पहिला अर्थसंकल्प २६ नोव्हेंबर १९४७ ला सादर करण्यात आला. तो अर्थसंकल्प फक्त १९७ कोटींचा होता. त्यातील ४६ टक्के खर्च संरक्षण यंत्रणेवर होता. मा. मोदीजी पंतप्रधान व्हायच्या आधीपर्यंत म्हणजे ६६ वर्ष ९ महिने अकरा दिवस या देशाचे सर्वाधिक मोठे बजेट २०१३-१४ चे १६ लक्ष ६५ हजार २९७ कोटी होते. मात्र, मोदीजींसारखा एक नेता देशाच्या प्रगतीचा विचार करून येतो. आध्यात्मिक, शैक्षणिक, पायाभूत सुविधा, आर्थिक सर्व क्षेत्रांमध्ये प्रगतीचा प्रयत्न करतो. मोदीजी पंतप्रधान झाल्यानंतर या अकरा वर्षांत आपले बजेट ५० लक्ष ६५ हजार कोटी रुपयांचे झाले आहे. तिप्पटीने बजेट वाढले आहे. १९६० ला महाराष्ट्राची स्थापना झाली, त्यानंतर दरडोई उत्पन्न २०१३-१४ पर्यंत १ लक्ष २५ हजार रुपये होते. २०२३-२४ मध्ये २ लक्ष ७७ हजार ६०३ रुपये दरडोई उत्पन्न आहे,’ याचाही त्यांनी उल्लेख केला.
महामार्गांचे जाळे
काँग्रेसच्या ५४ वर्षांच्या राज्यात महाराष्ट्रात ४७६६ किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग होते. गेल्या अकरा वर्षांत १८ हजार ३६६ किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग झाले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ही किमया आहे.
स्वच्छता अभियान
पंतप्रधान मोदीजींनी स्वच्छता अभियानात १२ कोटी शौचालये बांधली. आज गावागावात शौचालये झाली आहेत. एवढ्या वर्षांत महिलांची प्रसाधनगृहे बांधू शकले नव्हते. आज ९९ टक्के गावांमध्ये स्वच्छतागृह झालीत. २०४७ मध्ये विकसित भारत म्हणजे भयमुक्त, विषमतामुक्त, नक्षलमुक्त, रोजगारयुक्त, समरसतायुक्त, समतायुक्त, गौरवशाली भारत होय. मोदीजींनी पाच जन्म घेतले तरीही ३७० कलम रद्द करू शकत नाही, असे विरोधी पक्षातील नेते म्हणायचे. पण मोदीजींनी करून दाखवले.
आयात कमी, निर्यात वाढली
आज आपण फाईव्ह ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे स्वप्न बघतोय. झिरो इफेक्ट, झिरो डिफेक्ट आणि झिरो इम्पोर्ट. एकेकाळी आमचे बजेट सैन्यदलाला लागणारी सामग्री खरेदी करण्यात जायचे. आता आयात कमी झाली आणि निर्यात वाढली. आपल्या युद्धसामग्रीचे महत्त्व वाढले आहे. कोरोनाकाळात अनेक श्रीमंत देशांमध्ये जनतेला मोफत व्हॅक्सीन देण्याची हिंमत नव्हते. मोदीजींनी २२० कोटी व्हॅक्सीन मोफत दिले. यासाठी हिंमत लागते.
जय अनुसंधान
देशात इनोव्हेशन, इन्व्हेशन्स कमी होते. २०१४ पूर्वी देशात ५ आणि ७ हजार पेटंट भारतात व्हायचे. अमेरिका ५ लाखांच्या वर होते. मोदीजींनी ‘जय जवान, जय किसान आणि जय अनुसंधान’चा नारा दिला. आता देशात ७० ते ७५ हजारांच्या वर पेटंट होऊ लागले आहेत. आपला देश प्रत्येक क्षेत्रात पुढे जात आहे. आत्मनिर्भर भारत, व्होकल फॉर लोकल याचे मोठे योगदान आहे.
विकसित राष्ट्राची पायाभरणी
काशी कॉरिडोर, करतारसिंग कॉरिडोर, वन रँक वन पेन्शनचा निर्णय केला. पुलवामा सर्जिकल स्ट्राईक तर हा देश कधीही विसरणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महू, चैत्यभूमी, दीक्षाभूमी, लंडनचे घर, महाड विकसित केले. जनधन खाते मोठ्या प्रमाणात उघडले गेले. देशात गरिबांची बँक खातीच नव्हती. इन्कमटॅक्स रिटर्नमध्ये सात पटींनी वाढ झाली. आयुष्यमान भारतने अख्ख्या देशाला दिलासा दिला. देशात एकच एम्स होते. अटलजींनी सहा निर्माण केले. मोदीजींनी पंधरा एम्स वाढवले. आज गडचिरोली, वर्धा, गोंदिया, चंद्रपूरमध्ये मेडिकल कॉलेज आले. लोकांचा विश्वास असेल तर एक नेता विकसित राष्ट्र निर्माण करू शकतो.
४४ लक्ष कोटी रुपये थेट जनतेच्या खात्यात
आयआयएम फक्त १३ होते. अकरा वर्षांत वीस झाले. विद्यापीठे ७२३ होती, आज दिड हजारांहून अधिक झाली आहेत. मोदीजींनी ४४ लक्ष कोटी रुपये जनतेच्या खात्यांमध्ये थेट देण्याचे काम केले. देशाला पुढे नेण्याचा संकल्प फक्त मोदीजींनी करून होणार नाही. आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाने केला पाहिजे. गावांमधील शाळांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत हा संदेश पोहोचला पाहिजे.
चंद्रपूरची सैनिकी शाळा
देशातील पहिली सैनिक शाळा १९६१ मध्ये स्थापन झाली. आज एनडीएच्या परीक्षेत देशातील सर्वाधिक विद्यार्थी चंद्रपूरच्या सैनिक शाळेतून पास झाले, याचा मला खूप आनंद आहे. हे कळल्यावर सर्जिकल स्ट्राईक करणारे राजेंद्र निंभोरकर यांनी कौतुक करण्यासाठी मला फोन केला. आज ही सैनिक शाळा बघण्यासाठी लोक येतात आणि अभिमान व्यक्त करतात.
वाघांचा जिल्हा
जगातील सर्वाधिक वाघ चंद्रपूरमध्ये आहेत. काँग्रेसने वाघांचे संवर्धन केले नाही. मी वनमंत्री झालो तेव्हा ११२ वाघ होते आज ६०० हून अधिक वाघ झाले आहेत. आपण वन अकादमी केली. चंद्रपूरमध्ये कॅन्सर हॉस्पिटल तयार झाले. प्रत्येक जिल्ह्याच्या विकासातूनच देशाची प्रगती होईल. शेतकरी, गरीब, महिला, युवा प्रत्येक घटकासाठी मोदीजींनी कामे केली आहेत.

