
स्वप्निल रा. मोहितकर
भद्रावती तालुका प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज नेटवर्क
भद्रावती : चंद्रपूर- नागपूर राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डे व उंचवटे निर्माण झाल्याने अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधित कार्यकारी अभियंता यांनी रस्ता बांधकाम करणाऱ्या खाजगी कंपनीस वेळोवेळी लिखित पत्र देऊन सुद्धा कंपनी याकडे दुर्लक्ष करीत आहे. होणाऱ्या अपघातास कंपनी जबाबदार राहील असे देखील संबंधित विभागाने दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
सदर महामार्ग खाजगीकरनांतर्गत बांधा आणि वापरा या धर्तीवर तयार करण्यात आला. या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांकडून पथकर वसूल केल्या जातो. त्या मार्गाची देखभाल दुरुस्ती खासगी कंपनीकडे आहे. दिनांक १५ मे २०२३ ला सार्वजनिक बांधकाम विभाग चंद्रपूर क्रमांक १ चे कार्यकारी अभियंता यांनी उद्योजक वरोरा – चंद्रपूर – बल्लारपूर टोल कंपनी लिमिटेड नागपूर यांना या संदर्भात पत्र दिले. या पत्राची दखल घेऊन कंपनीने तात्पुरती काही भागाची दुरुस्ती केली आणि इतर मार्ग तसाच सोडला. परत हा मार्ग अनेक ठिकाणी खराब झाला असून काही ठिकाणी मोठमोठे खड्डे तर काही ठिकाणी उंचवटे निर्माण झाले आहे. या रस्त्याने प्रवास करणाऱ्या दुचाकी, चारचाकी वाहनांना अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.भद्रावती सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता यांचे माहितीनुसार सदर कंपनीस आमचे कार्यकारी अभियंता यांनी वेळोवेळी पत्र दिले तसेच तोंडी सूचना दिल्या. परंतु याकडे कंपनी दुर्लक्ष करीत आहे.














