
लोकशाही म्हणजेच
लोकांनीच लोकांसाठी
चालवलेले राज्य हे
जनतेच्या हितासाठी…..
गलिच्छ राजकारण
धोक्यामध्ये लोकशाही
भ्रष्टाचारी नेत्यामुळे
आली ही हुकूमशाही….
हल्ली लालची नेत्याने
सारे विकले इमान
सरकारी मालमत्ता
ठेवा तुम्ही आत्मभान….
वाटे ही हुकूमशाही
देश कर्जात चालला
बंद करून शिक्षण
रस्ता मंदिर धरला ….
जाती धर्मातील द्वेष
इथे लागला वाढाया
सर्वधर्म समभाव
जसा लागला संपाया…..
देश संविधानातून
योग्य रित्या चालवावे
देशहित महत्त्वाचे
व्यक्ती पूजेला टाळावे…
लोकशाही नष्ट झाली
स्वंतत्रता गमावली
नीतिमत्ता माणूसकी
स्वार्थापायी हपापली …
धर्माच्याच नावावर
घडवूनी त्या दंगली
सत्तेसाठी देशातली
आज शांतता भंगली….
कवियत्री सौ. कल्पना अशोक टेंभुर्णीकर
नागपूर














