
तुझ्या प्रेमाचा आज
उगाळत राहू चंदन
बांधून प्रेमाचा धागा
जपू अनोखे बंधन।।
खर तर भाऊ बहिण हे नातेच जगात श्रेष्ठ आहे, आणि तितकेच पवित्र आहे. कारण ते आईच्या एकाच उदरातून जन्म घेतात आणि लहानपणापासून ते एकत्र राहतात. एकत्र खेळतात आणि एकमेकांचे सुख दुःख वाटून घेतात. आई बाबा कधी भावाला रागवत असतील तेव्हा बहिण समोर येऊन म्हणते दादा अजून लहान आहे तो मोठा झाला की करील अभ्यास. आणि बहिणीची काही चूक झाली की भाऊ आई-बाबांना समजावून सांगतो. असे त्यांचे नाते खूप छान असते. ज्याप्रमाणे फुल आणि त्याचा सुगंध वेगळा करता येत नाही त्याप्रमाणे बहिण भाऊ यांचे नाते कधीच वेगळे करता येत नाही. एवढे त्यांचे नाते अगदी घट्ट असते. भाऊ बहिणीच्या नात्यात आपुलकी ,माया ,ममता,प्रेम हा जिव्हाळा खूप छान दिसून येतो.
ते लहानपणापासून एकत्र राहत असतात पण जेव्हा बहिणीचे लग्न होते आणि ती सासरी जाते तेव्हा त्या दोघांनाही त्यांच्या विरहाचे दुःख सहन करावे लागते ते एकमेकांना अगदी घट्ट मिठी मारून रडत असतात. त्यांचे प्रेम पाहून सर्वजण गहिवरून जातात.
खरं तर बहिण भाऊ हे एकाच आईच्या उदरी जन्म घेतात पण त्यांना नियती वेगळे करते आणि बहिणीला लग्न झाल्यावर सासरी जावे लागते. कदाचित नियतीला हे मान्य नसेल की भाऊ बहिण जन्मभर एकत्र राहिलेलं म्हणून तिने ते नाते वेगळे केले. जरी तिने वेगळे केले तर ती भाऊ- बहिण नात्यातील प्रेम कमी करू शकली नाही म्हणून पण बहीण भाऊच्या नात्यात अजून गोडवा आला आणि त्यांचे नाते अजून छान फुलत गेले. म्हणून म्हणतात एकदा प्रेमाचा धागा जुळला की तो कधीच तुटत नाही उलट तो एक रेशमी धाग्याने अजून घट्ट बांधले गेले जाते..
साथ तुझी असावी मला
कायम माझ्या जीवनात
याच बहिणीचे मिळो प्रेम
मला खरे तर प्रत्येक जन्माला..
असे या बहीण भावांच्या नात्यांचा पवित्र महिमा म्हणून आपण रक्षाबंधन हा सण साजरा करत असतो..
लेखिका प्रा.समिंदर निवृत्तीराव शिंदे
लातूर














