
आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा शब्द नसून हा अत्यंत वेगाने बदलणाऱ्या जगातील एक अत्यंत बलवान असा बदल आहे म्हणजेच सुरवातीच्या आणि अलीकडच्या काळामध्ये जी काही प्रगति आपल्याला दिसून येते, तो ठोस बदल म्हणजे AI होय.वर्तमानकाळाला तंत्रज्ञानाचे युग म्हटले जाते. सध्याच्या काळात रोबोसारख्या मशिनरीची निर्मिती झाली आहे. हे रोबो मानवाप्रमाणे बोलतात, मानवाप्रमाणे कार्य करतात तसेच ज्याप्रमाणे मनुष्य स्वतःच्या बुध्दीने कार्य करतो तसेच ह्या मशिनरी देखिल स्वतःच्या बुध्दीने कार्य करतात त्यालाच AI चां आविष्कार म्हटले जाते. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे शब्दशः मराठीत रुपांतर केलें तर कृतीम बुध्दीमत्ता होय याचा अर्थ म्हणजे कृत्रिम वस्तुने दर्शविलेल्या बुध्दीमान वर्तनास कृत्रिम बुद्धिमत्ता असे म्हणतात. हि कृत्रिम वस्तु साधारणतः संगणकच असते. कृत्रिम बुद्धिमत्ता हा विषय विज्ञान कथांमध्ये जास्त आढळत असला तरी, हि संगणक शास्त्रातील एक महत्वाची शाखा आहे. या शाखेमध्ये यंत्र शिक्षण (machin learning) त्यांचे बुध्दीमान वर्तन व परिस्थितीला जुळवून घेण्याची क्षमता आदींचा अभ्यास केला जातो. या शाखेतील संशोधन मुख्यतः स्वयंचलित कार्य करण्यासाठी आवश्यक असलेली बुध्दीमान वर्तणूक करू शकतील अश्या यंत्राशी निगडीत आहे.
उदाहरणादाखल नियोजन (planing), संयोजन (joining), निदान विषयक प्रश्नांची उत्तरे शोधण्याची क्षमता,हस्तक्षर, आवाज, चेहरा ओळखण्याची क्षमता इत्यादी अश्या प्रकारे कृत्रिम बुद्धिमत्ता दैनंदिन जीवनातील समस्या सोडविणारी विज्ञानातील एक शाखा आहे कृत्रिम बुद्धिमत्ता असणाऱ्या प्रणाली या अर्थशास्त्र, आरोग्य विज्ञान, अभियांत्रिकी, संरक्षण, कॉम्प्युटर गेम्स आणि संगणक प्रणाली यामध्ये वापरल्या जातात.
कृत्रिम बुध्दीमत्ता चां शोध जॉन मककॉर्थी यांनी १९५६ साली लावला होता. तसेच कालांतराने ह्या तंत्रज्ञानाला खुप मागणी वाढू लागली.वर्तमानकाळात देखिल सर्व क्षेत्रात AI चां वापर केला जात आहे.भविष्यामध्ये तर कृत्रिम बुद्धिमत्ता मनुष्याच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनणार आहे.
कृत्रिम बुद्धिमत्ता चे फायदे:-
१) AI चां वापर रिटेल, शॉपिंग, फॅशन, सिक्युरिटी सर्वेलन्स, स्पोर्ट्स अनाल्याईस, मॅनूफक्च्यरींग व प्रोडक्शन अश्या जवळपास सर्वच क्षेत्रात होऊ लागला आहे.
२) बँकेमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग व्यवहार सांभाळण्यासाठी , शेयर्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी तसेच मालमत्ता सांभाळण्यासाठी केला जातो.
३) रुग्णालयामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता असलेल्या प्रणाली या बिछाण्यांचे वेळापत्रक तयार करणे,कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळा बदलत्या ठेवणे, वैद्यकीय माहिती देणे यासारख्या कामाकरीता वापरत आहोत
४) शिक्षण क्षेत्रात सुध्दा AI ने प्रवेश केला आहे. केरळ राज्यातील एका शाळेत AI टीचर क्लास घेत आहे. परंतु खरं पाहल तर मेकॅनिकल टीचर पेक्षा हुमन टीचर केंव्हाही चांगले असतात.
५) टेस्ला ही कार बनवणारी जगातील आघाडीची कंपनी AI चां वापर करून ड्रायव्हर लेस कार बनविण्याच्या तयारीत आहे.
६) गूगल ॲपमध्ये AI वापरले जातात ज्यामुळे प्रवास करणे आता सगळ्यांसाठी कमालीचे सोईचे झाले आहे.
७) क्रुझ ही देखिल AI वापरून मोठ्या शहरातील लोकांना रोबोटॅक्सी सेवा देणारी पहिली कंपनी आहे. जगभरात AI रिसर्च सेंटर उपलब्ध आहे तिथे यावर नवनवीन प्रयोग होत असतात. तसेच IIT, NIT, IIIT सारख्या अनेक संस्था सुध्दा आहेत जिथे AI विषयी उच्च शिक्षण दिले जाते. डिजिटल गोष्टीमध्ये AI चां खुप फायदा होऊ शकतो जसे की, स्मार्टफोन्स, ऑनलाईन बँकिंग व्यवहार, ऑनलाईन डेटा फाईल्स सुरक्षित राहू शकतात, त्यासोबत डेटा चोरी होणे, ऑनलाईन लिंक्स फ्राड इत्यादी गोष्टीवर नियंत्रण AI या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आणता येते. त्यामुळे शालेय जीवनातच AI बद्दल विद्यार्थ्याना माहिती होणे गरजेचे आहे. शालेय अभ्यासक्रमात AI हा मुख्य विषय असायला हवा. हा विषय मुलांना केवळ सर्जांशिलच बनवीत नाही तर मुलांची कल्पनाशक्ती, तार्किक विचार, समस्या सोडविणे आणि निर्णय घेण्याची क्षमता वाढवते. झपाट्याने बदलणाऱ्या जगाची आपल्या मुलांना लहानपणापासूनच ओळख करून देणे महत्वाचे आहे. हे जरी खरे असले तरी वास्तविक पाहता AI चे तोटे पण आहेत.
कृत्रिम बुद्धिमत्तेचे तोटे:-
१) गूगल किंवा त्यापेक्षाही कर्तृत्ववान चाट जिपीटी ला कोणताही प्रश्न विचारा उत्तर क्षणार्धात समोर येणार. गूगलवर मिळालेल्या आयत्या माहितीमुळे मनुष्य बुध्दीमान होणार का? त्याचा बुध्यांक वाढेल का? आपल्याला सर्व तयार माहिती मधून समाधान मिळणार का? आपण काहीतरी नवे शिकलो कुणीतरी बनलो याचं आत्मसुख भेटेल का? वडिलोपार्जित जमीन संपत्ती मिळाली म्हणून घरी बसून खाण्याने माणूस आळशी बनतो, आरोग्य सुध्दा गमावतो, शारिरीक व्याधी जडतात, रोगांना निमंत्रण मिळते. कृत्रिमरीत्या तयार केलेल्या फुलांना सुगंध येतो का?
गूगल असो की चाट जीपिटी दोन्हींच्या प्रभावामुळे वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे. नव तरुणाचा, मुलांचा बुद्ध्यांक कमी होत आहे. वाचन कमी झालं , मनन चिंतन या तर मुलांच्या मनाला स्पर्शही करीत नाही त्यामुळे लेखन कलेकडे सुध्दा साफ दुर्लक्ष झाले. त्याचबरोबर AI मुळे नोकऱ्या कमी होत आहे त्यामुळे तरुणांच्या बेरोजगारीचे प्रमाण वाढू शकते. कृत्रिम मिळणारी वस्तू असो वा ज्ञान त्याने क्षणिक आनंद मिळेल परंतु दीर्घकाळ समाधान मिळवायचं असेल तर ज्ञान कृत्रिम नकोच तर ते शाश्वत पाहिजे.
कृत्रिम बुद्धिमत्तेचे फायदे व तोटे बघता कृत्रिम बुद्धिमत्तेचा चांगला वापर जर केला तर तो फायदेशीर ठरेल जसे संविधान जेवढं चांगलं वापरल जाईल तेवढं ते चांगलं राहील अस डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे येत्या १०-१५ वर्षात बदल घडणार असून तरुणपिढी यासाठी तयार नाही. कृत्रिम बुद्धिमत्ता तारक की मारक तर हे तारक ही आहे आणि मारक सुध्दा आहे. जसे की याचा वापर जितका चांगला तितका वाईट ही आहे पण वापरणाऱ्या माणसावर अवलंबून आहे.चाट जीपीटीच्या चांगल्या आणि वाईट अश्या दोन्ही बाजू आहे. याच्या वापरामुळे नवीन कल्पकता जन्माला येते.९०%लोकं AI ला शिव्या देतात कारण जॉबच्या प्रश्नांमुळे जसे कॉम्प्युटर ला देत होते. योग्य रीतीने भान ठेवून वापर केला पाहिजे.AI १० सेकंदात चित्रकार राजा रवी वर्मा पेक्षा १०० पटीने चांगले चित्रं काढतो. नाण्याला जश्या दोन बाजू असतात तश्याच दोन बाजू AI ला सुध्दा आहे. ते आपल्या चांगल्या आणि वाईट वापरावर पूर्णपणे अवलंबून असते. त्यामुळे AI चांगले वापरले तर तारक व वाईट वापर केला तर मारक ही ठरू शकते. जर आपण शिक्षणाच्या फायद्यासाठी त्याचा अधिकाधिक वापर करू शकलो तर तो एक आशीर्वाद असेल परंतु जर आपण ते आपल्यावर तुडवू दिले किंवा आपण त्याच्याबरोबर वाहत गेलो तर तो एक शाप देखिल ठरू शकतो.
कु. शिल्पा ज्ञानेश्वर ठाकरे
विज्ञान शिक्षिका
नवखला ता. नागभिड जिल्हा चंद्रपूर














