आजचा लेख – बदलता गणेशोत्सव

0
66

आजचा लेख – बदलता गणेशोत्सव

गणपती उत्सव म्हटला की मला माझ्या लहानपणीचे दिवस आठवतात. भाद्रपद महिन्यातील येणारा गणेशोत्सव म्हणजे प्रसन्नतेचा दहा दिवसांचा सण. आम्ही मुली गणपती विराजमान झाले की, सार्वजनिक मंडळामध्ये पूजेला जात असू. दहा दिवस दररोज गणेशभक्त भक्तिरसात तल्लीन होऊन पूजा अर्चना करायचे.मात्र तेव्हा आम्हा मुलींना भक्तीपेक्षा गणपती जवळचा मिळालेला प्रसाद आणि वेगवेगळे मोदक खूप आवडायचे. तसेच गणपती जवळ वेगवेगळे खेळ खेळायला आवडत असे.कारण त्या दहा दिवसात अभ्यास कमी आणि मोजमस्ती जास्त असायची.सांस्कृतिक कार्यक्रमाची तर मेजवानी जणू.तेव्हाचा सार्वजनिक गणपती म्हटला की, चित्रपट, आर्केस्ट्रा ,डान्स ,नाटक आदींची रेलचेल राहायची .जे सर्वांना हवेहवेसे वाटायचे .पूर्वी छोट्याशा टीव्हीवर सार्वजनिक मंडळात चित्रपट दाखवायचे.ते अगदी मन लावून बघताना खरच खूप मजा यायची . मात्र आता तशी मजा सार्वजनिक गणेशोत्सवात राहिलेली नाही.कारण आता हे युग इंटरनेटचे आहे. प्रत्येकाच्या हातात मोबाईल आला टीव्हीवर वेगवेगळे चॅनल्स.प्रत्येक चॅनलवर वेगवेगळ्या मालिका.जे हवं ते दूरदर्शनवर बघता येतं. चित्रपटाची तर दूरदर्शनवर रेलचेल असते . त्यामुळे आधी सारखे कार्यक्रम बघण्यात आता सार्वजनिक मंडळात कुणालाच रस राहिला नाही.तरीपण मला आताच्या काळातील बदललेला गणपती उत्सव खूप आवडतो . कारण गणपती फक्त उत्सवच राहिला नाही .तर त्याच्या नावाने दहा दिवस वेगवेगळे उपक्रम सार्वजनिक मंडळ हाती घेतात.जसे की रक्तदान, अन्नदान , आरोग्य तपासण्या, वृक्षारोपण, गरजूंना पुस्तक वाटप, सामान्य ज्ञान स्पर्धा आणि बरेच काही सामाजिक उपक्रम गणपती मंडळ राबवताना दिसतात .त्याचप्रमाणे मंडळात सामाजिक संदेश देणारे देखावे, महिला सबलीकरण ,स्त्रीभ्रूणहत्या, अंधश्रद्धा निर्मूलन ,पर्यावरण रक्षण, ग्रामीण जीवन, बळीराजा असे सुंदर देखावे तयार केले जातात .”सेव्ह नेचर सेव अर्थ” हा अत्यंत उपयुक्त असा मोलाचा संदेश सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातून दिला जातो.यातून गणपती पाहायला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या मनामनात एक प्रकारची सामाजिक जनजागृती होते. तसेच काही कार्यक्रम आयोजित करून ज्ञानदान ,विचारांचे आदान प्रदान ,कला संवर्धनाच्या दृष्टीने संगीत, नृत्य ,चित्रकला प्रदर्शन वगैरे कार्यक्रम करणे, काही ज्वलंत प्रश्न असेल तर त्यावर चर्चा घडवून प्रश्नांचे गांभीर्य समाजापर्यंत पोहोचविणे.सध्या तर वैज्ञानिक दृष्टिकोन समोर ठेवून ‘चांद्रयान थ्री ‘चे देखावे मंडळात साकारण्यात आले .यातून लहान बालकांच्या मनाला आनंद मिळून आकाशात उंच झेप घेण्याची जिज्ञासा निर्माण होते .खरंच अशा सार्वजनिक गणेश मंडळाचे कौतुक करावेसे वाटते.समाजाला जे देणं लागतं ते या उपक्रमांमधून आणि देखाव्याच्या माध्यमातून दिसून येते. त्याचप्रमाणे गणेशोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण समुदायाला एकत्र आणणे, शेजाऱ्यांना उत्सवाच्या निमित्ताने महाप्रसादाला बोलावणे हे एकोपाचे आणि सर्वधर्मसमभावाचे दर्शन घडवते. असा हा सर्वांना समाविष्ट करून घेणारा श्री गणेशाचा उत्सव आहे.
परंतु काही प्रमाणात मंडळाच्या माध्यमातून जी जीवघेणी स्पर्धा दिसून येते ती निराशादायी आहे.गणेशोत्सवानिमित्त विविध ठिकाणी त्या परिसरांचा राजा म्हणून बाप्पा विराजमान होतात.परंतु हे करताना दुसऱ्या मंडळा सोबत स्पर्धा दिसून येते.विजेच्या तालावर बेधुंद होऊन फिरकणारी तरुणाई बघितली तर मन विषन्न होतं.मुंबई पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान अनेक घटना घडल्या.चोरीचे प्रकार समोर आले .विजेतील लेझर लाईटच्या प्रकाशाने काहींच्या डोळ्यांना इजा झाल्याचे वाचनात आले.त्यामुळे एकीकडे गणेशोत्सवात होणाऱ्या चांगल्या गोष्टीमुळे मन सुखावते तर दुसरीकडे अशा घटना मुळे आपल्या वेळचा गणेशोत्सव बरा होता असे म्हणावेसे वाटते.त्यामुळे बाप्पांच्या उत्साहात साऱ्यांनी सहभागी व्हावे .परंतु कोणत्याही गोष्टीचा अतिरेक नको एवढे मात्र लक्षात ठेवावे.

लेखिका संगीता राजेश नागदिवे..सना
यवतमाळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here