
पावसाने आपली बाजू मांडत आपले मनोगत व्यक्त केले आहे. पाऊस अवेळी पडण्याची त्याची काही कारणे आहेत हे त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले आहे. हल्ली मला सगळे शिव्या देत असतात, कधीही येतो वेळी-अवेळी मार्च, एप्रिल मध्ये मी पृथ्वीवर बरसल्यामुळे खूप नुकसान होते. नुकताच आंब्याला मोहोर आलेला असतो.किंवा छोट्या छोट्या कैऱ्या झाडाला लागलेल्या असतात त्या गळून पडतात. दक्षिणेकडे काजूचे ही नुकसान होते. बायकांची वाळवणीची कामे पण होत नाही. मग लोक मला म्हणतात,”” काय मेला हा पाऊस केव्हा पण येतो, काही ताळतंत्रच या पावसाला उरले नाही.” किंवा जुलैमध्ये खूप पाऊस पडतो आणि सगळीकडे ओला दुष्काळ होतो, म्हणजेच पूर येतो आणि अती पावसामुळे सगळ्यांची वाताहात होते. खूप घरांचे , झाडांचे, नुकसान होते. जनजीवन विस्कळीत होते. सगळ्यांचे बरोबर जरी असले तरी पर्यावरणाचा समतोल राखायला तुम्हीच मला मदत केली पाहिजे ना. तुम्ही झाडांचा र्हास होईल असे एकही कृत्य करता कामा नये. झाडे कापू नये, जास्तीत जास्त झाडे लावावी, निसर्गाचा समतोल राखावा मग मी कशाला बरे वेळी अवेळी येईल? मला माहित आहे माझ्या येण्याने सृष्टी न्हाऊन निघते. पक्षी आनंदातात तर मनुष्यप्राणी ही आनंदून जातो. मोर आपला पिसारा फुलवतो. समुद्राला उधाण येते. शेतकरी पण खुश होतो. मी तुम्हाला शब्द देतो जर तुम्ही निसर्गाचा समतोल बरोबर राखला तर मी नक्कीच वेळच्यावेळी बरसेल. कृपया तुम्ही मला दोष देऊ नका.
लेखिका रेखा डायस
गोवा












